May 22, 2025

ppr

“स्व.आप्पासाहेबांनी कर्तव्यदक्षतेचा संस्कार पेरला…!”:- वामनराव माने “स्व.आप्पासाहेब चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न…!”

Spread the love

“स्व. आप्पासाहेबांनी कर्तव्यदक्षतेचा संस्कार पेरला…!”
:- वामनराव माने “स्व. आप्पासाहेब चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न…!”

पंढरपूर प्रतिनिधी “आदर्श शिक्षक स्व. आप्पासाहेब चव्हाण यांनी त्यांच्या जीवनामध्ये कर्तव्यदक्षतेचा संस्कार पेरला.” असे गौरवोद्गार पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती मा. श्री. वामनराव माने यांनी काढले. ते येथील स्व. आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांस पुरस्कार वितरण समारंभामध्ये बोलत होते. पुढे बोलताना मा. वामनराव माने सर म्हणाले “स्व. आप्पासाहेब चव्हाण यांच्या अमरसिंह, अमोल आणि प्रतापसिंह या तीनही मुलांनी कर्तव्यदक्षतेच्या संस्काराचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवला आहे. त्यामुळेच प्रतिष्ठानच्या माध्यमातून साहित्यिक, सामाजिक आणि शैक्षणिक या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचे काम होत आहे.” यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्री हरीशदादा गायकवाड, जि. प. सदस्य सुभाषराव माने, शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव, तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबईचे सी. ई. ओ. पंडितराव देशमुख, प्राचार्य कैलाश करांडे, श्रीमती सुवर्णा आप्पासाहेब चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार वितरण समारंभाच्या सुरुवातीला मंदार केसकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांनी स्व. आप्पासाहेब चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रतापसिंह चव्हाण यांनी प्रस्ताविकातून प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. प्रतिष्ठानच्या माध्यमातून सौ. रेणुका बुधारम, सोलापूर यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी श्री. पांडुरंग शिंदे, अनगर यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आणि श्री. ज्ञानेश्वर दुधाने, करकंब यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी शाल, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्तींचा परिचय श्री. शहाजी देशमुख व श्री. ज्ञानेश्वर मोरे यांनी करून दिला. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात साहित्य क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवर सौ. रेणुका बुधारम यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्या म्हणाल्या “साहित्य सेवा करणाऱ्यांच्या पाठीवर आप्पासाहेब चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळालेली कौतुकाची थाप ही महत्त्वपूर्ण आहे.”
याप्रसंगी बोलताना शिराळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा. निशिकांत परचंडराव म्हणाले “माध्यमिक जीवनापासूनच त्यांच्यावर आप्पासाहेब चव्हाण यांचे संस्कार आणि प्रभाव असल्यामुळे जीवनामध्ये यश संपादन करता आले.”
यावेळी जिल्हा परिषद सोलापूरचे सदस्य मा. श्री सुभाषराव माने म्हणाले “आप्पासाहेब चव्हाण सर यांचा सर्वच शैक्षणिक विभागांमध्ये सहभाग असल्यामुळे ते बहुआयामी असे व्यक्तिमत्व होते. आणि चव्हाण सरांच्या माध्यमातून शिक्षण मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने मी आप्पासाहेबांच्या शिकवणींचा लाभार्थी आहे.”
याप्रसंगी बोलताना पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री हरीशदादा गायकवाड म्हणाले – “स्व. आप्पासाहेब चव्हाण स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून निरंतर सुरू असलेले हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आणि वाखाण्याजोगे आहे.”
यावेळी तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईचे सी. ई. ओ. मा. श्री पंडितराव देशमुख म्हणाले – “स्व. आप्पासाहेब चव्हाण यांच्याकडे विनम्रता, संवेदनशीलता, संयम आणि कर्तव्यनिष्ठता हे महत्त्वाचे गुण होते. त्यांचे गुण अंगीकारल्यामुळे आमच्याही जीवनात सकारात्मक बदल झाले व प्रगती झाली.”
या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी पंढरपूर शहरातील व तालुक्यातील राज नाईकनवरे – शांताप्रभू प्रशाला, अजनसोंड, कु. सलोनी कांबळे – सिध्देश्वर प्रशाला, तपकिरी शेटफळ, आदित्य भोसले – जि. प. शाळा, नारायण चिंचोली, कार्तिकी हावळे – बालविकास प्राथमिक प्रशाला, बोहाळी, द्वारकाधीश सातारकर – आदर्श प्राथमिक विद्यालय, पंढरपूर, वेदांत स्वामी – माताजी निर्मलादेवी विद्यालय, पंढरपूर, स्नेहा शिंदे – कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर, ओवी कौलवार – आदर्श बाल व प्राथमिक विद्यालय, पंढरपूर या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनासाठी म्हणून सन्मानचिन्ह शैक्षणिक साहित्य व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार समारंभासाठी पंढरपूर तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैद्यकीय या व इतर क्षेत्रातील बहुसंख्या मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करण्यासाठी पंढरपूर येथील राणा प्रताप ग्रुप व वैष्णव मेळा कट्टाचे बिपिन परचंडे, संजय गावडे , उन्मेश चोरगे , प्रसाद पुरी , शंतनु खिलारे, रविराज सोनार, प्रशांत पाटील, महेश भोसले, ज्ञानेश्वर गवळी, माऊली निकते, पिंटू शिंगण, आनंद शिंदे, रविकांत कदम, किशोर मोळक, विष्णुपंत गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे अतिशय सुंदर, नेटके व सुश्राव्य असे सूत्रसंचालन डॉ. सचिन लादे यांनी केले तर सचिन कदम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

You may have missed