October 18, 2024

ppr

मंगळवेढा तालुक्यात चाराछावणी व चाराडेपो सुरु करा- आ आवताडे यांची अधिवेशनात मागणी

Spread the love

प्रतिनिधी पंढरपूर

पावसाने अपेक्षेप्रमाणे हजेरी न लावल्याने पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संपूर्ण राज्यातील विविध भागांमध्ये पूर-महापूर यांनी थैमान घातले असताना मंगळवेढा तालुक्यामध्ये मात्र या उलट परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याची खूप मोठे संकट तालुक्यावर ओढवले आहे. त्यामुळे या भागातील पशुधन जगविण्यासाठी मंगळवेढा तालुक्यामध्ये चाराछावणी व चाराडेपो सुरू करण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार आवताडे यांनी लक्षवेधी मांडत मतदारसंघाकडे विधीमंडळाचे लक्ष वेधले.विधानसभा सभागृहामध्ये ही मागणी करत असताना आमदार आवताडे यांनी सांगितले की, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांचे पशुपालन हे उदरनिर्वाहाचे जोडसाधन आहे. परंतु सध्या पावसाने ओढ दिल्याने पाण्याची व चाऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. या भागातील पाण्याची भूजल पातळी ८००ते १००० मीटर एवढ्या खोलीवर असल्यामुळे पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे अनेक पशुपालक ४००० ते ५००० हजार रुपये प्रतीटन दराने ऊसाचा चारा आणत आहेत. सध्या मतदारसंघाच्या मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांमध्ये गावभेट दौरा सुरु असताना अनेक शेतकरी व पशुपालक यांनी या टंचाई पार्श्वभूमीवर चारा डेपो सुरु करण्याची माझ्याकडे मागणी केली होती. मंगळवेढा तालुक्यातील पशुधन पालकांची मोठी संख्या पाहता तब्बल पाच लाख लिटर दुधाचे प्रतीदिन संकलन होत आहे. जनतेच्या या अर्थकारणाचा महत्वपूर्ण असणारा दुध व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी व पशुधन जगविण्यासाठी शासन पातळीवरून सदर चारा डेपो लवकरात-लवकर सुरु करण्याची कार्यवाही व्हावी अशी मागणी आ. आवताडे यांनी केली आहे. या चाराछावणी व चाराडेपो सुरु करण्यासाठी आमदार आवताडे यांनी मागील काही दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर संबंधित मंत्री महोदय यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून पत्र व्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे.त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील चाळीस गावांसाठी वरदायिनी असणारी ४०गाव भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू होऊन या योजनेअंतर्गत येणारे पाणी वीस गावांपर्यंत पोहोचले आहे. परंतु उरलेल्या वीस गावांना व इतर वाड्या-वस्त्यांवर माणसांना व जनावरांना पिण्यासाठी या योजनेचे पाणी देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले. दुष्काळी तालुका असा नैसर्गिक नीतिमत्तेचा कलंक गेली अनेक वर्ष आपल्या माथ्यावर असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी व उरलेल्या गावांमध्ये ही पाणी लवकरात-लवकर सुरू करण्याची मागणी आमदार आवताडे यांनी यावेळी केली.सन २०१८-१९ मध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा व सांगोला तालुक्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या जनावरांच्या मंगळवेढा तालुक्यामध्ये ६० चाराछावण्या चालकांचे जवळपास १२ कोटी व सांगोला तालुक्यातील १६० छावण्या चालकांचे २२ कोटी बिले शासनदरबारी प्रलंबित आहेत. परंतु तत्कालीन चारा छावण्या चालकांचे बिल अद्यापही अदा करण्यात न आल्यामुळे या चालकांना खूप मोठ्या अर्थिक विवांचनेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आशा चालकांची बिले ही लवकरात लवकर मिळावेत अशी मागणी आमदार आवताडे यांनी केली आहे. राज्यातील शेतकरी व सर्व सामान्य जनतेचे प्रती अतिशय संवेदनशील आणि भक्कम असणारे हे सरकार या सर्व मागण्या लवकरात लवकर मार्गी लागण्याच्या अनुषंगाने पावले उचलतील असा विश्वास आमदार आवताडे यांनी व्यक्त केला.*चौकट – थकीत चाराछावण्या बिलाच्या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तरादाखल आपली भूमिका स्पष्ट करताना ….यांनी सांगितले की, संबंधित जिल्हाधिकारी यांना याबाबत आवश्यक त्या सूचना देऊन ही सर्व बिले लवकरात लवकर आदा करण्यासाठी आदेशीत करण्यात येणार असल्याचे सांगितले चौकट- *एका गावात पडलेला पाऊस दहा गावच्या माथ्यावरमंगळवेढा तालुक्यामध्ये मंडळ निहाय पर्जन्यमापक यंत्र आहे एका मंडळ मध्ये दहा ते अकरा गावांचा समावेश आहे एका गावात पाऊस पडला तर दहा गावात पाऊस पडल्याची नोंद शासन दरबारी होत असल्यामुळे दुष्काळी गावावर अन्याय होत असून याकडेही शासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले